जेेष्ठ नागरिकांनी प्रपंची कसे रहावे

जीवनाच्या तिसर्‍या टप्यावर आल्यावर मनुष्य जेष्ठ नागरिक होतो.

त्याने बालपण, तारुण्य, व आताची वृद्धावस्था अनुभवली असते. तेव्हा या अवस्थेतून ताऊन, सुलाखून आलेल्या जेष्ठ नागरीकाने प्रपंचात आपले स्थान कसे ठेवावे? असा एका जेेष्ठ नागरिकाने मला प्रश्‍न केला.

प्रश्‍न फार नाजुक होता. मी थोडा विचार केला व म्हणालो जेष्ठ नागरिकाने ‘जेथे जाईन तेथे तैसाची होईन’ असे रहावे.

जर तुम्ही आजोबा झाला असला तर तुमच्या नातवाबरोबर बालका प्रमाणे वागा-खेळा-मस्ती करा. त्याचे सारखे बोबडे बोला.

तो बालक आता मोठा होतो तारुण होतो. त्याचे लग्न होते. त्याला सहचारिणी मिळते. त्याच्या भोवती भाऊ, बहिणी प्रमाणे मेहूणा-मेहूणी यांचा गोतावळा वाढतो. तेथे तो चक्रावला जातो. त्या तरुणाच्या डोक्यात गोंधळ होतो. येथे मी कुणाचे ऐकू, कुणाला चांगलं म्हणू व कुणाला समजाऊन सांगू. तेथे परत घरातील जेष्ठ नागरिक म्हणून तुमचेवर जबाबदारी येते.

जेष्ठ नागरिकाने प्रपंचात धावपळ केलेली असते. प्रपंच आपल्या परीने उभा केलेला असतो. पण या अवस्थेत त्यानी ज्या अडचणी, दु:ख भोगली त्याचा पाढा सारखा प्रपंचात करत बसू नये.

उगाच न विचारता सल्ला मसलत करीत बसु नये. जर विचारले तरच सांगावे. सांगुन ऐकले तर ठिक नाही ऐकले तरी ठिक. अशी मनोवृत्ती ठेवावी.

येथे प्रपंचात आपण कुठे थांबायचे हे ज्ञान जेष्ठ नागरिकांनी घेऊन त्याचे आचरण करावे. पैसा, ऐश्‍वर्य, सत्ता व संपत्ती ही आपण बरोबर आणली नव्हती व ती बरोबर नेणार नाही. याची जाणीव ठेऊन त्यांचा मोह कमी कमी करत जावे.

सर्वांशी प्रेमाने वागावे. दुसर्‍यांचे दु:ख कमी करता येईल, याकडे लक्ष द्यावे. तर जेष्ठ नागरिक खरा सुख संपन्न नागरिक होईल.

Leave a comment