आजकाल शहरामध्ये गेल्यावर मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर जेवणापुर्वी काटे, चमचे, सुरी समोर आणून ठेवतात.
खर तर या वस्तु समोर बघितल्या की भिती उत्पन्न होते. जेवण कसे येईल याचा संभ्रम निर्माण होतो. पण अविचारी मानव समोरच्या थाटाला बघुन त्या काटे, चमचे व सुरीच्या साह्याने जेवण करण्याची मानसिकता वाढवितो.
खेडेगावात घरी गेल्यावर मात्र जेवणापूर्वी हात स्वच्छ करुन जे अन्नग्रहण करावयाचे आहे, त्या अन्नाला हात जोडून नमस्कार केला जातो व अन्नदात्या परमेश्वराचे चिंतन करुन सर्वांना असे अन्न मिळो ही प्रार्थना केली जाते.
तेथे अन्नाची, जेवणाची भिती वाटत नाही. तर त्या अन्नापासून उर्जाची निर्मिती होते. या पाठीमागे कांही वैज्ञानिक विचार आहेत, त्यांचा विचार करणे गरजेचे आहे.
आयुर्वेद हे भारतीयांचे प्राचिन आरोग्य शास्त्र आहे. त्या शास्त्रात सांगितल्या प्रमाणे आपले शरीर हे पंचतत्वानी निर्माण झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एक एक तत्वाचे अस्तित्व आहे.
ही पंचतत्वे व पांच बोटे यांचा संबंध पुढील प्रमाणे –
1. अंगुष्ठ – अंगठा – अग्नी तत्व
2. तर्जनी – वायु तत्व
3. मध्यमा – आकाश तत्व
4. अनामिका – पृथ्वी तत्व
5. कनिष्का – पाणी तत्व
जेव्हा आपण हाताने जेवतो, तेव्हा पाचही बोटांना आपसात जोडून तोंडात घास घालतो. यामुळे पंचतत्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारे अन्न उर्जा देणारे असतं.
हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्न ग्रहण करण्याचा इशारा देतो, त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचे सर्व लक्ष खाद्यावर केंद्रीत असल्यामुळे शरीराला मिळणारी पोषकता वाढते अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही ना याचा अंदाज येतो.
प्रपंच करीत असताना ही हाताची बोटे वेगवेगळ्या दिशेने प्रपंच करीत असतात. त्यामध्ये पंचमहाभुतांचा मेळावा नसतो. तेथे फक्त श्रीमंती व ऐश्वर्याचा थाट असतो.
त्यामुळे निर्जिव वस्तुने सजिव प्राण्याला माणसाला भरवणे हे काटा चमच्याचे काम होय. परंतु सजिव हाताने सजिव माणसाला भरवणे हीच खरी संस्कृती आहे.
ही संस्कृती आपण अनेक वर्षे जोपासत गेलो आहे. पुढे ही हीच संस्कृति जोपासणार आहोत. त्यामुळे हातानेच जेवण करावे, या उक्तीला मी समर्थन देतो.
हाताने जेवण करा म्हणजे पंचमहाभुते पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांना समानतेने वागवा. त्यांना एकत्र ठेवा व त्या एकीतून जगण्याची उर्जा वाढवा असा संदेश दिला जात आहे.