जीवनात गुरुला अनन्य साधारण स्थान आहे.
गुरु बिन कौन बतावे बाट? असे संत कबीरांनी सांगितले आहेच.
गुरुब्रम्ह गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: ।
अशी गुरुची महती सर्वत्र वर्णन केली आहे.
या प्रपंचात गुरु शिवाय आपणाला कुणाचा खरा आधार नाही.
शिक्षणासाठी गुरुची गरज असते. अन्न-वस्त्र-निवारा मिळावा म्हणून मातापिता गुरु म्हणून समोर येतात.
त्यांचे मार्गदर्शनाखाली आपला प्रपंच सुरु होतो.
प्रपंचात पत्नीपण गुरु स्थानी येते. काय योग्य, काय अयोग्य याचे मार्गदर्शन ती वेळोवेळी करीत असते.
गावगाड्यात, राजकारणात मित्र हितचिंतक गुरु म्हणून सल्ला देत असतात.
या प्रमाणे गुरुची मदत घेवून आपण प्रपंचातून परमार्थात पदार्पण करत असतो.
त्या प्रवासातपण संतमहंत मंडळी गुरु म्हणून आपल्या संपर्कात येतात. त्यांचे ज्ञानाने, विचाराने प्रपंचातील आसक्ती कमी कमी होत आपण परमार्थात पदार्पण करतो.
येथे पण गुरुचे महत्व अनन्य साधारण सांगितले आहे. याप्रमाणे गुरु, गांवगुरु, देशगुरु, जगद्गुरु असे वेगवेगळे गुरु आपल्या संपर्कात येतात.
त्यांचे संगतीत जीवनात अमुलाग्र बदल घडून येतात. हे झाले प्रापंचिक गुरुचे स्थान .
आता वैज्ञानिक गुरुचे आपण अवलोकन करु.
या स्पर्धेत विज्ञानाने पण एक गुरु तयार केला आहे. त्याला अॅप म्हणतात. तो एक रोबोट म्हणून काम करतो.
जगात कुठेही जायचे असेल तर त्याची मदत घेता येते. त्याला आपण कोठे आहोत हे सांगावे लागते व आपणास कोणत्या ठिकाणी, कोणत्या देशात जायचे आहे, हे सांगावे लागते. अशा प्रकारे तयार केलेला रोबोट अॅप आपल्या प्रवासाची सुत्रे ताब्यात घेतो.
आपण निवांत प्रवास चालू करतो. एखादे ठिकाणी आपला मार्ग चुकला, वळण घ्यायचे चुकले तर तो आपणास सावध करतो व पुढचा मार्ग दाखवितो.
याप्रमाणे आपण निर्धास्त राहून इच्छित ठिकाणी, पोहोचू शकतो.
ज्यावेळी मी स्वत: युरोप ट्रीप मध्ये हा अनुभव घेतला, तेव्हा मी या गुगल अॅपचे आभार मानले.
त्या अॅपने मला माझी इच्छत स्थळ गाठून दिेले, मी समाधानी झालो.
प्रपंचात काय, प्रवासात काय, राजकारणात काय गुरु असावेच लागतात.
तसेच परमार्थात पण गुरुची नितांत गरज असते. परमार्थात साधक प्रपंचाची जबाबदारी संपवून परमार्थात प्रवेश करीत असतो. तेथे त्याची वाटचाल चालू होते.
तेथे पण संत-महंत यांची संगत, सानिध्य गुरु म्हणून त्याला लाभते व त्याचे जीवन बदलून जाते.
प्रपंचातील राग, लोभ, क्रोध, मोह, माया या सवंगड्यांना सोडून त्याचा प्रवास एकट्याचा परमार्थात चालू होतो. तेथे पण साधकाला योग्य ज्ञान देवून त्याचे चारित्र्य चांगले बनवून त्याला उत्तम गतीकडे नेण्याचे काम हे गुरु करतात.
तेव्हा प्रपंचातून विज्ञानापर्यंत व तेथून परमार्थात गुरुची गुगलची साथ किती महत्वाची आहे, हे आपल्या ध्यानात येईल.