गणित आयुष्याचे, सोडवितो ते धनी

आपण आयुष्याकडे त्यातील घटनांकडे पाहिले, की लक्षांत येते की, आयुष्य हे एक अवघड गणीत आहे व जो ते गणित बरोबर सोडवितो तो खरा तज्ञ गणिती होय.

आयुष्याचा विचार करता आपण लक्षात घेवू आयुष्य 80 वर्षाचे आहे. त्यातील अर्धे म्हणजे 40 वर्षे रात्रीत झोपण्यात जातात. त्यातील निम्मी म्हणजे 20 वर्षे बालपण व म्हातारपण यांत जातात.

राहिलेल्या 20 वर्षात पण कधी नविन भेटी, नविन संबंध, विरह, शिक्षण, परिक्षा अशा अनेक गोष्टी चिंता देवून जातात आणि अशा या राहिलेल्या छोट्याशा आयुष्यात आपण संपत्तीसाठी भांडत बसतो.

पण शेवटी सर्व संपत्ती येथेच ठेवून जावे लागते. तेव्हा इतके मौल्यवान आयुष्य मिळण्याचा फायदाच काय?

गणित अवघड आहे. जसे शब्दकोषात असंख्य असंख्य शब्द असून मौन रहाणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते.

खाण्यासाठी जगभरात अनेक पदार्थ असताना उपवास शरीरासाठी उपयुक्त समजला जातो. हे पण जगण्याचे कोडेच आहे.

सृष्टीत अनेक रंग असताना सर्वात श्रेष्ठ पांढरा रंग समजला जातो.

हे पण सृष्टीतील एक कोडेच आहे.

जगात पहाण्यासारख्या इतक्या गोष्टी असताना डोळे मिटून अंतकरणातून पहाणे,चिंतन करणे, श्रेष्ठ मानले जाते.

जीवनांत अनेकजण सल्ला देणारे असतात. तरी आपल्या आत्म्याचा सल्ला श्रेेष्ठ असतो.

जीवनांत अनेक आकर्षणे असताना सिद्धांतानी सांगितलेल्या मार्गाने जाणे श्रेष्ठ मानले जाते.

यातून आपण काय घ्यायचे तर बीजगणितातील स्वाभिमान आणि काय सोडायचे तर प्रपंचातील आभिमान, गर्व.

ज्यावेळी आपण थोरामोठ्यांच्या सानिध्यात जावू तेव्हा परमेश्‍वराचे आभार मानू कारण त्या वृद्धांनी आपले आयुष्याचे गणित बरोबर सोडविले असते व वृद्धापकाळ गाठला असतो.

प्रत्येक ठिकाणी आपण आहे त्या परिस्थितीत ठेवण्याबद्दल परमेश्‍वराचे आभार मानले तर आयुष्याचे गणित सोपे होत जाईल.

ज्यावेळी आपण कामावर जावू तेथे बेकार ठेवले नाही म्हणून परमेश्‍वराचे आभार माना.

आपण आरोग्य संपन्न आहोत म्हणून परमेश्‍वराचे आभार माना.

परमेश्‍वराचे आभार यासाठी मानायचे की त्याने आपणास जीवंत ठेवणार्‍या उपायांची किंमत कळू दिली.

तेव्हा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा उपयोग करुन आनंदी जीवनाची गोळाबेरीज चांगली करा. उत्तम गणिती बना हा यातील उद्देश आहे.

तोच आयुष्याच्या गणिताचे उत्तर काढणारा मानकरी समजावा.

Leave a comment