धर्म म्हणजे आचरण, दीनचर्या, स्वभाव. मनुष्य म्हणून जन्म घेतल्यावर काही आचार, काही विचार ठरलेले असतात. त्यानुसार माणूस वागत असतो.
प्रथमत: माणूस म्हणून जन्म घेतल्यावर मानवता धर्म मनांत ठेवून इतरांशी वर्तन करणे म्हणजे धर्माचरण होय.
इतर प्राणीमात्र व मनुष्य यामध्ये हाच फरक जाणवतो. काय योग्य व काय अयोग्य हे फक्त माणूस जाणू शकतो. त्याला धर्माची शिकवण असते. वागणूकीची चौकट असते. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच त्याच चौकटीत चालावे लागते.
माणसाने आपल्या मानवतेच्या धर्माप्रमाणे आपले आचरण ठेवावे. यासाठी त्याच्या अंगी कमीतकमी सात गुणांची गरज दिसून येते.
ते गुण असे –
1. धर्मामध्ये गंभीरता असावी. आपण कोणत्या संस्काराने वावरत आहोत याची सतत जाणीव ठेवणे याला गंभीरता म्हणतात. ती धर्मामध्ये महत्वाची आहे. स्वत:ला ओळखा, स्वत:ला कमी लेखु नका, एखाद्या गोष्टींचा विचार सूक्ष्मतेने करा.
2. दुसरा गुण म्हणजे सौंदर्य : सौंदर्य कशात आहे, वरवर दिसणार्या गोष्टीत की, अंतरंगात असलेल्या प्रेमात याची ओळख करुन घ्या व त्याप्रमाणे आचरण ठेवा. शरीर झाकण्यासाठी धर्माचे वस्त्र असणे गरजेचे आहे. समाजात वागताना विवस्त्र होवून वागु नका. धर्माचरण करा, लज्जा, मर्यादा ओळखा, चांगली संगत ठेवा, कुसंगतीचा त्याग करा.
3. धर्माचरणात मौनाचे महत्व फार आहे. वाचेने मौन धारण करणे व जरुर तेथे योग्य ते बोलणे हा धर्माचा भाग आहे. त्याच बरोबर आरोग्यासाठी योग्य व जरुरी पुरता आहार घेणे हे पण धर्माचे लक्षण सांगितले आहे.
4. शितलता : तुम्ही क्रूर बनु नका. कोणतेही कृत्य करण्याआधी विचार करा. कोणावर अन्याय होत नाही ना? याचा विचार मनांत ठेवा.
5. सरलता : हा पण धर्माचा गुण आहे. निर्भिडता अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा. आयोग्य मार्गाने मिळविलेल्या संपत्रीचे मालक असणारांची संगत करु नका.
6. सुदाक्षिण्य : स्वत: कष्ट करुन मिळविलेल्या धनातून दुसर्याला मदत करा.
7. जीवदया : हे धर्माचे मुळ आहे. अहिंसेसाठी सत्य, अचौर्य, ब्रम्हचर्य, निष्परिग्रहता याचे पालन करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही जीवाची काया, वाचा, मने कळत न कळत हिंसा होवू नये याकडे सुक्ष्मतेने लक्ष द्या. क्षमा याचना व क्षमाधर्माचे पालन करा.
8. प्रपंचात तटस्थ, निस्पृह वृत्ती ठेवा.
9. एखाद्याच्या चांगल्या गुणाचे कौतुक करा. त्याच्या कार्याची अनुमोदना करा. चांगल्या गोष्टी पहा, वाचा, अनुकरण करा.
10. संस्कारक्षम परिवार धर्मासाठी आवश्यक आहे. तुमच्या धर्माचे विघ्न ज्या परिवारामध्ये येणार नाही, याची काळजी घ्या. आवश्यक्तेनुसार मदत करणारा परिवार धर्म भावना वाढवितो. परिवारात राहून परिवारातील माणसे अनुकुलतेनुसार धर्माचरण करतील तर तो धर्म होईल.
11. यासाठी सारासार विचार, विवेक ठेवून आचरण करणे याला धर्म म्हणायचे.