मला लिहायला, वाचायला येऊ लागले तसे मी घरात येणारी पत्रे आजीला वाचून दाखवित असे. प्रत्येक पत्रावर चि. आणी पूज्य असे शब्द दिसायचे.
शंका म्हणून मी आजीला विचारले आजी हा काय प्रकार आहे?
आजीने मला जवळ घेऊन सांगतिले बाळा हा आशीर्वाद देण्याचा किंवा नतमस्तक होण्याचा प्रकार आहे.
आपली भारतीय संस्कृती सांगते, की लहान बालकांवर अगर शिष्यावर चिरंजीव होण्याचा संस्कार करावा. तो सतत रुजत रहावा, यासाठी लहानांना पत्र लिहिताना चिरंजीव असे लिहीत जावे.
असे वरचेवर लिहिच्यामुळे त्या प्रकारचा संस्कार त्या मुलांवर होतो. तो चिंतन करु लागतो. या चिंतनातून त्याला उत्तर सापडते. चिरंजीव हा एक आशीर्वाद आहे. हे एक अढळ पद आहे.
तिथपर्यंत पोहचण्याचा आपणास प्रयत्न करावयाचा असे.
चिरंजीव पद प्राप्त झालेले कोण कोण आहेत?
असे सप्त चिरंजीव म्हणजे
1. अश्वथामा,
2. बळी,
3. व्यास,
4. हनुमंत,
5. विभिषण,
6. कृप,
7. परशुराम
हे अनादि काळा पासून आजपर्यंत लोकांसमोर आदर्श म्हणून आहेत. तसे आदर्शवत तुम्ही व्हा ! असा हा आशीर्वाद या चिरंजीव लिहिण्यात दिला जातो. हा एक मोठा पुरस्कार आहे.
मानव जातीतील मानवता धर्माचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रत्येक आई-वडीलांना आपला पुत्र चिरंजीव होवो, असे वाटतच असते. म्हणून या चिरंजीव पदाची घोषणा पत्रातून किंवा आशीर्वादातून ही मंडळी करीत असतात.
हे चिरंजीव पद मिळण्यासाठी कांही गोष्टी महत्वाच्या आहेत.
- ती व्यक्ती निराभिमानी असावी.
- कोणत्याही पदाची किंवा मानसन्मानाची हाव, त्या व्यक्तीमध्ये नसावी.
- प्रपंच चांगला करुन परमार्थात पदार्पण करणारी असावी.
- आपले म्हणजेच खरे असा हट्ट करणारी नसावी.
- एखाद्या ठिकाणी त्याचे कामाचे कौतुक केले तर त्या कौतुकाने हुरळून न जाणारी असावी.
- राग लोभ सोडून वागणारी असावी.
- सर्वांवर प्रेम करणारी असावी पण त्या प्रेमाने प्रपंचात चिटकून रहाणारी नसावी.
- त्या व्यक्तीने ब्रम्हचर्य पालन करावे.
- दास्य भक्ती करावी.
एवढे सर्व गुण ज्यावेळी साधकामध्ये दिसतील तेव्हा तो साधक चिरंजीव पदाला योग्य असा म्हटला जातो. हीच अपेक्षा प्रत्येक आई-वडील, नातेवाईक यांची असते. त्यामुळे ते हा आशीर्वाद देत असतात.
हा आशीर्वाद वाया जावू नये म्हणून साधकाने चिंतन, मनन करुन आपले आचरण तसे बनवावे आणि जेष्ठांनी या पदाची महती लक्षांत घेवून ज्या ज्या वेळी संधी येईल तेथे ‘चिरंजीव हो’ असा आशीर्वाद द्यावा..