सुसंगती, सुविचार आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीचे आचरण करण्यासाठी चातुर्मास ही एक पर्वणीच होय.
कोणतीही गोेष्ट करावयाला घेतली की त्यासाठी तयारी ही करावीच लागते.
जे कांही करावयाचे असते त्याचे नियोजन, संघटन या गोष्टी महत्वाच्या असतात.
जैन धर्मियांच्यात चातुर्मासाला आणि चातुर्मासा दरम्यानच्या दिनचर्येला अतिशय महत्त्व आहे.
या पर्वामध्ये मुख्यत्वेकरुन साधु, साध्वी व श्रावक अशी बैठक असावी लागते.
त्यासाठी आपल्या संघावर लक्ष असलेल्या साधु अथवा साध्वींना वरचेवर विनंती करुन त्यांना चातुर्मासाठी आमंत्रित करावयाचे असते. हे काम विश्वस्त मंडळी करीत असतात.
एक-दोन भेटी नंतर हे साधु साध्वी आपल्या वरीष्ठ आचार्याची अनुमती घेण्याचा प्रयत्न करतात. आचार्य सर्व गोष्टींचा विवेकाने विचार करुन मग त्या गांवी चातुर्मासासाठी जाण्याची अनुमती साधू साध्वी यांना देतात.
येथे चातुर्मासाच्या पर्वाच्या तयारीला सुरवात होते. चार महिने एका ठिकाणी राहून आराधना करणेसाठी योग्य दिवस, वेळ, दिशा पाहून साधु व साध्वींचा गांवात प्रवेश होतो.
चातुर्मास ही पर्वणी असल्यामुळे ती बालक, पालक, जेष्ठ, कनिष्ठ सर्वांना आनंददायी असते.
तेव्हा त्या पर्वकाळामध्ये श्रावकाची दिनचर्या कशी असावी, त्याने कोणते आचार पाळावेत, नियम, उपासना कशी करावी या बाबत श्रावक व संत यामध्ये चर्चा होते व संपूर्ण दिवसाची दिनचर्या तयार होते, ती फलकावर लावली जाते.
प्रवेशानंतर साधु संत एक एक दिवस एकेका भागात जशी अनुकुलता असेल तसे गोचरी/ भिक्षा घेण्या साठी जातात.
त्यामध्ये साधकाची व संतांची ओळख होते. या काळात संत बारकाईने प्रत्येकाच्या घरातील संस्काराचे निरीक्षण करीत असतात व त्याप्रमाणे आपल्या प्रवचनातून साधकाला सूचना देत असतात.
विश्वस्त मंडळींकडून चातुर्मासापुर्वी वर्षभराचे मंदिरांचे आर्थिक नियोजन करून ठेवलेले असते. साधकाने आपल्या कुवतीनुसार / इच्छेनुसार आपले आर्थिक योगदान करून मंदिराचे कामकाज वर्षभर सुरळीत राहावे यासाठी मदत करावयाची असा अलिखित संकेत आहे.
मंदिराची स्वच्छता, आरास या गोष्टी चातुर्मासापूर्वीच करावयाच्या असतात. या चार महिन्यात कोणत्याही प्रकारे जीव हत्या होईल अशी कोणतीही कामे करावयाची नसतात.
साधु भगवंत या पुर्वी ज्या ज्या गांवी चातुर्मासासाठी थांबेल तेथील लोक वेळ काढून त्यांना भेटण्यासाठी व त्यांची जीनवाणी श्रवण करणेसाठी मुद्दाम येतात. एक दोन दिवस मुक्काम करतात.
अशा आलेल्या अतिथींची सोय करणे संघाचे काम असते. त्याप्रमाणे चातुर्मासापुर्वी हे काम विश्वस्त मंडळी ठरवून टाकतात.
यासर्व विवेचनातून भौतिक सर्व तयारी आपण चातुर्मासापूर्वी करतो.
पण खरी तयारी ही आध्यात्मिक करावयाची असते, त्यासाठी सकाळी उठल्यापासून सामायिक, देवसी प्रतिक्रमण, राई प्रतिक्रमण या गोष्टी साठी नियोजन करणे व त्या गोष्टी करणे महत्वाचे असते.
त्याची तयारी चातुर्मासापुर्वी करावी लागते.
श्रावकांसाठी पाठशाळा चालू ठेवणे- जेथे धर्म आचरणाचे शिक्षण मिळते आणि साधका साठी भोजनालय – जेथे चातुर्मासात ग्रहण करण्यायोग्य / उपवासाचे भोजन बनवून साधकांना त्यांच्या साधनेत मदत करण्याचे काम देखील विश्वस्त मंडळी करत असतात.
एकूणच काय! तर या चातुर्मासाच्या उपवास, उपासना आणि उचित सादरीकरणासाठी सुद्धा बरीच पूर्वतयारी करावी लागते हे विसरून चालत नाही.