चातुर्मास एक पर्वणी

चातुर्मासाचा चार महिन्याचा काळ आषाढ महिन्या पासून कार्तिक महिन्या पर्यंतचा होय.

या चार महिन्यात काय काय करावे व आपल्या जीवनाला वळण कसे लावावे याचे मार्गदर्शन ज्या चार महिन्यात होते त्याला चातुर्मास म्हणतात.

आषाढ पासून कार्तिक पर्यंत येणार्‍या चार महिन्याच्या काळास पर्वणी म्हटले आहे.

या चार महिन्यात साधू संत, साधक एका ठिकाणी एकत्र येऊन आपली आराधना करीत असतात. तप करणे, जप करणे, व्याख्याने ऐकणे, सेवा पूजा करणे, सामायिक, प्रतिक्रमण करणे या क्रिया नित्य नियमाने चातुर्मासात केल्या जातात.

तेथे या काळामध्ये साधु भगवंतांचे सानिध्य असते. म्हणून या काळाला पर्वणी म्हटले आहे.

जैन धर्मामध्ये या विशिष्ठ काळाला फार महत्व सांगितले आहे. साधु संतांची व्याख्याने त्यातून साधकामधील होणारे परिवर्तन हे यातील महत्वाचे असते.

या चार महिन्यात अत्यंत सोपा छोटासा नियम रोज साधकाने घ्यावयाचा असतो. पण तो नित्यनियमाने पालन करावयाचा असतो. त्यामुळे साधकाची वृत्ती नियम घेऊन तो आचरणात आणण्याकडे जाते.

तो का घ्यावयाचा याचे मार्गदर्शन व्याख्याना मध्ये साधु महाराज देत असतात. त्यामुळे नियमांचे ज्ञान व त्यांचे आचरण या गोष्टी सातत्याने करून घेतल्या जातात.

हे सर्व करीत असताना यात, मी माझे मोठेपण दाखविण्यासाठी करीत नसून देव गुरुंचे कृपेने या गोष्टी होत आहेत अशी भावना साधकाचे मनामध्ये येते.

तेथे त्याचा अहंकार कमी होतो. त्याचे तेज तपस्विचे चेहर्‍यावर दिसू लागते.

सामुदायिक तपश्‍चर्येमुळे आनंद द्विगुणीत होतो. तपश्‍चर्या बहुगुणी होत जाते व हा चार महिन्याचा कालावधी हा पर्वकाळ बनुन जातो.

याच चार महिन्यामध्ये मद, मोह, माया, मत्सर, द्वेष, अहंकार या वृत्तीवर नियंत्रण कसे आणावयाचे यांचे मार्गदर्शन होते. चित्तवृत्ती स्थिर व शुद्ध करण्याचे काम चातुर्मासात केले जाते. क्षमा भाव मनांत रुजविण्याचे काम या चार महिन्यात केला जातो.

याच चार महिन्यात पर्युषण हा आठ दिवसाचा पर्व काळ येतो. हा काळ जैन धर्मिय साधकाला पर्वणीचा काळ असतो. मोठ्या तपश्‍चर्या, जप केले जातात.

क्षमा याचनेचे बीज या काळामध्ये पेरले जाते. शतृत्व निर्मुलनाचे काम या पर्वामध्ये केले जाते.

काया – वाचा – मन या द्वारे झालेली कळत न कळत हिंसा व त्याचे परिमार्जन क्षमा याचनेने आपण करावी हा संदेश या काळात साधकाला दिला जातो.

संवत्सरी हा या पर्वाचा सर्वात मोठा दिवस समजला जातो. या दिवशी सर्व जीवांची क्षमा याचना केली जाते.

या सर्व आचारामुळे आपण प्रपंचातून थोडेफार कर्जमुक्त झाल्याची भावना निर्माण होते हीच चातुर्मास पर्वणी होय.

Leave a comment