बोलणं ही एक निसर्गाने (ईश्वराने) माणसाला दिलेली देणगी आहे.
तुमचे बोबडे बोलणे तुमच्या लहानपणीची आठवण करुन देते. ती आठवण आयुष्यभर लोकांच्या ध्यानांत रहाते.
मुल बोलायला शिकते ते या बोबड्या बोलीतूनच.
बोलणं हे एक साधन आहे. ज्या मधुन आपण आपल्या इच्छा, आकांक्षा, भावना, विचार, गरजा व्यक्त करु शकतो.
तुमच्या बोलण्यावरुन तुम्ही कसे आहात, याचा परीचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातील खरेपणा, प्रामाणिकतेचा भाव, समोरच्या बद्दलचा आदर, आपुलकी सारं कांही बोलण्यावरुन कळतं.
बोलणार्याच्या बोलण्यातून त्याची आर्तता जाणवते. बोलण्यातून आपण माणूस म्हणून कसे घडलो हे सिद्ध होते.
बोलण्यामुळे संगत बदलते. जीवन बदलून जाते.
ही शब्द साधना आहे. शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करीत करीत असतो.
मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल. हेही तितकच खरं वाटतं.
बोलतानां सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं या सवयी लावून घेणे गरजेचे आहे.
बोलण्याने ह्रदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते.
बोलणाराने बोलताना पाल्हाळ लावणे, समोरच्या व्यक्तीच्या सहनशिलतेची परीक्षा घेणं टाळावे.
बोलणं मुद्देसूद, आटोपशीर असावं. बोलणं म्हणजे शब्दांची बडबड नव्हे, न बोलता, शांत सोबत हे पण बोलणंच असते.
वेळांत वेळ काढून घरांत संवाद रुपाने बोलणं झालं पाहिजे. माणसा माणसातील मतभेद अंतर हे बोलण्यामुळे दूर होते.
मनांतील गैरसमज बोलण्यामुळे दूर करता येतात त्यासाठी जीवनाच्या शाळेत बोलणं शिकणं महत्वाचे आहे.
बोलणारा भेटला की जीवनाचा प्रवास सुसाट होतो.
ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, तो सदैव संयमी व विनयशील बोलतो. दुनिया त्याच्या प्रेमात पडते.
अशा व्यक्तींना अशक्य गोष्टी शक्य करता येतात.
जीवन सुंदर आहे ते चांगलं बोलून अधिक सुंदर करुया …