सध्या कोरोना मुळे रोज कुठून तरी निधन वार्ता येते. कुणीतरी नातलग देह त्याग करुन गेलेला असतो.
आपण मात्र प्रपंचात गुंतलेलो असतो. सर्वत्र गडबड चालू असते.
तो देह सोडून कां गेला? कुठे गेला? त्याला काय दु:ख होते, याचा कोणी विचार करीत नाही.
फक्त “भावपूर्ण श्रद्धांजली” एवढी ओळ लिहून आपण ऋणमुक्त झालो. अशी आपली कल्पना असते. पण त्याच्या जाण्यामागचा भाव आपण ध्यानात घेतला पाहिजे. त्याने जीवन कसे जगले, त्याने समाजसेवा कशी केली त्याचा प्रपंचातील भाव कसा होता, त्याने किती पैसे मिळविले यापेक्षा त्याने किती जणांची सेवा केली हा भाव लक्षात घेणे गरजेचे असते. तरच त्या भावातून आपली श्रद्धा ध्येयाकडे झेप घेईल. त्याचे अनुकरण करण्याची वृत्ती मनांत घर करेल.
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मृत्युची वार्ता येते, त्यावेळी चार अक्षराची श्रद्धांजली लिहून मोकळे होण्यापेक्षा त्याने घरात काय कामगिरी केली. तो घरातील कमवता बाप होता, ती प्रेमकरणारी आई होती, तो वयात आलेला भाऊ होता, लहान लहान लेकरे असलेली बहीण होती ही सर्व नाती व त्या नात्याला त्या व्यक्तीने दिलेला भाव याचा खुलासा त्याचे कुटूंबिया समवेत करणे ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली होय.
ज्या आई-बापांची म्हातारपणीची काठी बनावी, त्याच तरण्याबांड पोराचा बाप जेव्हा खांदेकरी होतो ना तेव्हा त्या बापाला जिवंत मरणयातना काय असतात हे कळतं. ९ महिने पोटात वाढवून जग पाहिल्यावर तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करणारी माऊली जेव्हा आपल्या बाळाचं प्रेत पाहून हंबरडा फोडते ना, तेव्हा तिची ही हाक त्या पांडुरंगाच्या कानावर पडते की नाही माहित नाही.
आपण मात्र सर्व सोपस्कार बारावा, तेरावा करुन उद्योगाला लागतो. कारण आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असते. पण ज्याचं प्रेत जळतं त्या घरातल्यानाच कळतं दु:ख काय आहे?
आपण मात्र चार ओळींची भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मोकळे होतो.
प्रत्येक माणूस प्रचंड कष्ट करीत प्रपंच करीत असतो, त्याचा आपला प्रपंचामुळे सहवास आलेला असतो. मात्र त्या सहवासाला क्षुल्लक किंमत देवू नका. त्याच्या सहवासातील भाव ओळखून तो सहवास अखंड मनाने राहो. ही प्रार्थना करा तरच ती भावपूर्ण श्रद्धांजली होईल.