भक्ती कशी करावी. असा एका साधकाने मला प्रश्न विचारला.
मी कामाच्या घाईत होतो. महत्वाची मिटींग होती. मोठ्या निर्णयावर चर्चा करावयाची होती.
नेहमीच्या प्रथेप्रमाणे बाहेर पडताना मी मातोश्रीला नमस्कार केला तिने पण माझ्या हातावर दही दिले. मी आनंदाने ते आचमन केले.
मनांत विचार आला आईने दहीच का दिले? विचाराची साखळी होती.
जीवनाकडे लक्ष देऊन पाहिले तर जीवन हे शुद्ध सात्वीक दूध आहे. त्यात प्रसंगानिरुप विरजणाचे थोडे मिश्रण टाकले की त्या दुधाचे दही तयार होते. त्या दह्यामध्ये घट्टपणा असतो. ते अदमुरे दही चविला फार अल्हाददायक असते. तेथे दुधाची विरजणाशी झोलेली अतुट मैत्री असते. परत दह्यातून दूध निर्माण होत नाही. हा अखंड प्रवास चालू राहतो.
अशी ही भक्तीची क्रिया सुरु होते. तिची सुरवात श्रद्धेने, विश्वासाने पुढेपुढे जात असते.
आता या अदमुर्या दह्यामध्ये पाणी मिसळले व रविने घुसळले की दह्याचे ताक तयार होते.
जसे प्रपंचात अनुभवाच्या रविने जीवन घुसळले की ज्ञानाचा अवतार समोर येतो व त्यामुळे जीवनात येणारे बरे वाईट प्रसंग सोसण्याची ताकद येते. ही दह्यावर रविने व पाण्याने केलेली भक्ती होय.
येथे पण ताकातून पुन्हा दही निर्माण होत नाही. तर ताकातून लोण्याचा गोळा समोर येतो.
तेथे पण लोण्यातून ताक निर्माण होत नाही, तर लोण्याला आच देऊन लोण्याचे साजुक तुप बनते.
तेथे पण तुपातुन पुन्हा लोणी होत नाही, तर आयुष्यभर स्नेह देणारे तुप मिळते.
त्यात वात घातली व दिवा लावला तर घरभर प्रकाशच प्रकाश पडतो.
ही लोण्याची तुपावरची भक्ती होय.
या प्रक्रीयेत होणार्या त्रसाचे कोणी गार्हाणे गात नाही, तर दिलेल्या अहुतीमुळे उच्च उच्चपदी जावून बसतो. ही आहे भक्ती.
तेव्हा भक्ती कशी करावी? याचे उत्तर समोर येते.
भक्ती ही दृढ विश्वासाने करावी. ज्याचेवर भक्ती करावयाची त्याचे चिंतन, मनन नित्यनियमाने करावे. मनात विनम्र भाव ठेऊन भक्ती करावी. एकदा एखाद्यावर श्रद्धा ठेवली तर त्या श्रद्धेपासून कधीही विचारीत होऊ नये, निस्पृहतेने भक्ती करावी.
भक्तीमध्ये कधी फळाची अपेक्षा करु नये.
भक्ती करण्याचे साधे सोपे साधन म्हणजे इष्ट देवतेचे नाम… ते सतत मुखात कसे राहिल याची जो काळजी घेतो, तो खरी भक्ती करु शकतो.
तेव्हा दोन अक्षरी रामाचे नांव सतत तोंडात कसे राहिल याचा प्रयत्न करावा.
चालता, बोलता, खाता, पिताना प्रत्येक श्वासाबरोबर रामाचे नाम घ्यावे. याप्रमाणे भक्ती साकार होते.