बाजार नको मैत्रीचा, मित्र असावा खात्रीचा

जून – जुलैचा महिना होता. सगळीकडे पेरण्यांची गडबड सुरु होती.

बाजारात बियांची बिजांची खरेदी विक्री चालू होती मला पण पेरणीसाठी बी खरेदीसाठी बाजारात पाठविले.

मला कळेना या एवढ्या मोठ्या बाजारातून आपण चांगले बी कसे खरेदी करावयाचे.

रस्त्यात मला माझा एक जुना मित्र भेटला. त्याला पाहून मला हायसे वाटले. त्याची माझी मैत्री ही अनेक वर्षाची होती. तो मोठा चाणाक्ष होता. एखाद्या गोष्टीचा तो बरोबर छडा लावत असे व खात्रीने आपले मत मांडत असे. तो मला भेटला ती वेळ पण भाग्याचीच म्हणावी लागेल.

मला बिजाची पारख नव्हती. बाजारात गर्दी होती तेव्हा असा रत्नपारखी मित्र समोर आल्यावर कुणाला आनंद होणार नाही. मी फारच सुखावलो गेलो. गप्पा करता करता बाजारात येण्याचे कारण मी त्याला सांगितले.

मित्रा माझ्या डोक्यात एक मैत्रीचे झाड लावण्याचा विचार आला आहे, पण त्यासाठी खात्रीच्या बिया या बाजारात मिळतील का?

असे विचारत आम्ही दोघे शेजारच्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेलो. गप्पा करता करता तो म्हणाला, तुझी काय कल्पना आहे. या झाडाची तेव्हा त्याने आपले मनोगत माझ्या समोर उभे केले. एका कवितेतून

मैत्रीचे झाड

असेल जे सतत डोळ्यासमोर माझ्या..
सांगेन मग त्यालाच, सुख-दु:खाच्या कथा..

काळजी घेईन त्याची छान, नियतीनी वाढवेन त्याला..
खतपाणी घालून घालून जीव ही लावेन त्याला..

रोज फुटेल नवी पालवी, त्याच्या माझ्या नात्याला..
फळा फुलांचे येतील बहर ऋतुमध्ये मैत्रीच्या नात्याला..

जाईन तेव्हा जवळ त्याच्या, धरेन अलगत फांदिला ..
ती ही देईल आधार तेव्हा, माझ्या उतरत्या खांद्याला..

बघा कधी तुमच्याही मैत्रीत आला रुसवा फुगवा ..
मैत्रीच एक झाड अंगणांत तुम्ही रुजवा..

यासाठीच विचारतो आहे मित्रा , कुठे मिळतील या मैत्रीच्या बिया..
सगळेच लावू एक झाड, अंगणात आपल्या आपल्या..

मात्र बाजार नको मैत्रीचा, पण मित्र असावा खात्रीचा.. तुझ्याच सारखा !

Leave a comment