मानवी देह हे एक साधन आहे. ते नुसते साधन नाही तर ते अर्थपूर्ण साधन आहे.
त्या साधनाचा साधक जसा अर्थ लावेल तसे जीवन घडेल.
तेव्हा देह रुपी असणार्या या साधनाचा अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे.
जीवनाच्या दोन बाजू आहेत. एक सकारात्मक जीवन व दुसरी नकारात्मक जीवन.
हे साधकाच्या हाती आहे की या देहाचा उपयोग सकारात्मक करावयाचा का नकारात्मक.
एखादा माणूस जन्मापासून कष्टाशी मुकाबला करीत समोर येणार्या संकटाला तोंड देत देत शेवटच्या क्षणापर्यंत लढतो व यशाचे शिखर गाठतो.
इतरांसाठी यशाची स्फूर्ती ठेवतो व आपले कार्य पुढे चालू ठेवतो. त्याला मिळालेले देहाचे साधन तो अर्थपूर्ण जीवन करण्यात उपयोगी आणतो.
मात्र याउलट काहीजण या देहाच्या (साधनात) कांही बिघाड झाला तर लगेच नाराज होतात, हाताश होतात. जगण्यात कांही अर्थच नाही आशा नकारात्मक भावनेत जगतात.
साधकाने हा जगण्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे.
अर्थपूर्ण जीवन काय आहे याची प्रचिती साधकाने रोज ब्रम्हमुहुर्तावर परमेश्वराकडून घेतली पाहिजे.
या मुहुर्तावर परमेश्वर साधकाला जीवनाचा अर्थ म्हणजे तू कोण आहेत? तुला कशासाठी पाठविले आहे? हे सांगत असतो.
तेव्हा हे साधका तू परमेश्वराचा अंकित आहेस, तुला त्याची इच्छा जाणून घेणे गरजेचे आहे. तेव्हा तुझ्या देहाचा तू अर्थपूर्ण अभ्यास कर, त्याची निगा राख व जीवन यात्रा सफल संपूर्ण करण्याचा प्रयत्न कर.
म्हणूनच म्हटले आहे….
पराधिन आहे जगती देह मानवाचा.
तेव्हा फळाच्या अपेक्षेने कर्म करु नका. केवळ कर्मे परमेश्वराला अर्पण करा.
तो कर्माचा लेखा जोखा ठेवत असतो. योग्य वेळ येताच साधकाला फळ देतो.
या अर्थपूर्ण असलेल्या देहाला तुम्ही कुचकामी बनवू नका.
जसे निसर्गात उभी असलेली झाडे मोठी होतात. त्यांचा पसारा सर्वत्र होतो. ती वठतात तरी ती सावली देतात, माणसाला आधार देतात.
तसे देहरुपी असणार्या साधकाने देहाच्या सहाय्याने जीवन अर्थपूर्ण करावे.
1 Comment
Tanmay Bhandari
बापूजींनी लिहिलेली ही चिंतने खरोखरच खूप सुंदर आहेत.