आनंदी वृत्ती निर्माण करणार्‍या विद्येची गरज

गरज ही शोधाची जननी आहे.

जीवनात प्रत्येक क्षणी आपणाला कशाची तरी गरज लागते व ती पूर्ण करण्यासाठी आपली धडपड चालू असते.

अशाच गरजेत आनंद आपण शोधत असतो, कारण त्या आनंदावर आपणाला जीवन समाधानी बनवायचे असते.

हे साध्य करताना कांही गोष्टीचा अभ्यास आपणास करावा लागतो व तो अभ्यास म्हणजे ती विद्या.

आपणाला जीवन आनंदी बनविण्याची कला हवी आहे त्यातून जीवनांत आनंद निर्माण करावयाचा आहे.

तेंव्हा आपली मानसिकता आनंदी बनविली पाहिजे. याचाच अर्थ आनंद जो आपल्या मनांत आहे त्याला जनात आणला पाहिजे.

आपले बोलणे, वागणे हे सर्वत्र आनंद निर्माण करणारे असावे.

संतुष्टी, समाधान आनंद ज्या विद्येपासून मिळतो ती विद्या गरजेची आहे.

माणसाने प्रथम आपल्या आनंदाची व्याप्ती लक्षांत घेतली पाहिजे. नंतर तो आनंद ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाचा शोध घेतला पाहिजे.

त्या मार्गाचे चिंतन मनन केले पाहिजे. त्या आनंदाची सीमा ठरविता आली पाहिजे. कुठे थांबायचे हे मनाने ठरविले पाहिजे. अपेक्षा सिमीत केल्या पाहिजेत.

आनंदी वृत्ती ही धीर गंभीर वृत्ती असते. त्यामध्ये चंचलता नसते.

येणार्‍या कोणत्याही प्रसंगात वृत्तीत चलबिचल होत नाही. ही अनिचलता निस्पृह कृती ही खरी विद्या आहे व आनंदी जीवनासाठी या विद्येची गरज आहे.

आपणाला जीवन आनंदी करावयाचे आहे. आनंद हा आपल्यातच सामावलेला आहे. मात्र आपण तो इतरत्र शोधत आहोत.

तेव्हा त्याला अंत:करणात शोधण्याची आपली मानसिकता तयार करणे ही जी विद्या आहे ती आपण आत्मसात करुया, जीवन आनंदी बनेल.

वृत्ती तशी होईल. गरज ही शोधाची जननी आहे. त्या जननीतून आपण आनंदाचा शोध घेत व जीवन आनंदी करु.

Leave a comment