आकर्षण म्हणजे ‘ओढ’.
निसर्गाने मानवामध्ये तसेच सृष्टीमध्ये दोन्हीकडे हा आकर्षणाचे दर्शन दिले आहे.
प्रथम झाडाचे फळ गुरुत्वाकर्षनाने वर न जाता जमिनीकडे ओढ घेत खाली पडते. हे सृष्टीतील आकर्षण पाहिल्यावर मनुष्य जीवनात कुठे कुठे आकर्षण दिसून येतात याचा विचार मनांत ठेऊ लागला.
बालकाला मन रमविण्यासाठी खेळण्यांचे आकर्षण वाटू लागते त्यामुळे अनेक खेळणी तयार झाली व बालकाला त्या खेळण्यांचे आकर्षण वाटू लागले. ती खेळणी जोपर्यंत मिळत नाहीत तो पर्यंत त्याचे रडणे चालूच असते. त्याला खेळण्याचा हव्यास जडलेला असतो.
प्रपंचात पैसे कमविण्याचे, श्रीमंत थाट करण्याचे, बड्या बड्या गाड्या, घरे घेण्याचे आकर्षण वाटू लागते व त्यामागे तो पळत सुटतो. त्याची शांतता, समाधान पार निघुन जाते.
जस जसे प्रपंचात गुंतत जातो तस तसे मुले, बाळे, बायको, नातेमंडळी, आई-वडील, तिर्थयात्रा, सिनेमा, नाटके यांचे आकर्षण वाटत जाते. त्यासाठी त्याची धडपड चालू होते. तेथेपण त्या धडपडीच्या जीवनामुळे त्याचे आनंदी जीवन बिघडून जाते.
असे हे आकर्षण माणसाला काय किंवा निसर्गाला जमिनीच्या दिशेने खाली धाव घ्यावयास लावते. काही वेळा अध:पतन घडविते. लक्षात ठेवा आकर्षणा मुळे कधीही उर्ध्व दिशेला जाता येत नाही.
ज्याला जीवनात उंची गाठावयाची असेल त्याने आकर्षणाचा मोह थांबविला पाहिजे थोडक्यात निदिध बनले पाहिजे.
प्रपंचात निदिध बनणे शक्य होत नाही. तेथे विवेक जागृत करणे गरजेचे असते.
प्रपंचातील सर्व गोष्टी यथासार संपादन केल्या नंतर आता आसक्ती, आकर्षण हे कमी करणे गरजेचे आहे. थांबणे गरजेचे आहे.
साधू-संतांनी आपणास हाच संदेश दिला आहे.
आकर्षण प्रपंचाची थोरवी वाढविते, तर परमार्थाची उंची वाढविण्यासाठी आकर्षणावर ताबा मिळविणे गरजेचे आहे.