जैन संस्कृति पुरातन मानली जाते.
ती ज्ञान, दर्शन, चारित्र्य या तीन तत्वांना धरुन आहे.
अर्थात जैन श्रावक हा व्यापारी तत्वावर चालणारा गृहस्थ आहे. कोणतीही गोष्ट करताना त्याचे लक्ष तराजुकडे असते. कुणाला जास्त अगर कमी द्यायचे नाही. हे त्याचे ब्रीद असते.
प्रपंचात काय किंवा परमार्थात काय त्याला लांडी लबाडी पटत नसते. कारण चोवीस तिर्थंकरानी त्याच्या गळी अतिचार उतरवलेले आहेत . त्याची कल्पना मर्यादा ही त्यांनी दाखविली आहे .
हे ज्ञान झाल्यावर साधक सतत कर्म करीतच असतो. त्याला कर्माचा खंड नसतो. त्या कर्माचे फळ त्याला वेळो वेळी मिळतच असतात.
तेव्हा केलेले कर्म हे परमेश्वराला अर्पण करावयाचे त्याचे श्रेय अगर दु:ख आपणाकडे घ्यायचे नाही. हे ज्ञान त्याला तिर्थकरांनी दिलेले असते.
त्यामुळे मन, वचन, काया या तिघांकडून होणारे पाप याला अविचार म्हणतात. मनाने, वाणीने, शरीराने होणारे नको ती कर्मे आपण परमेश्वराला अर्पण करावयाची व जीवन शांततेत, आनंदात व्यतीत करावयाचे ही शिकवण जैन धर्म देतो.
त्यामुळे अतिचार या शब्दाचे फार महत्व सांगितले आहे. प्रपंचात रोजच्या दिनचर्यात उठल्या पासून एवढ्या गोष्टी करतो की त्याचे आपणाला ज्ञान ही होत नाही.
तेव्हा ते ज्ञान होण्यासाठी जैन धर्मात 2 घडी( 48 मिनिटे) सामायिक क्रीया सांगितली आहे.
या क्रियेमुळे साधक चिंतन, मनन करु शकतो व एकेंद्रिय, बेइंद्रिय , त्रियेंद्रीय, चौरेद्रिय, पंचेद्रिय, मनुष्य अशाची जी कळत न कळत हत्या झाली असेल, सीमेचे उल्लघन झाले असेल तर त्याचे ज्ञान तो सामायिक मध्ये करुन घेतो व त्याची क्षमा याचना करणेसाठी सामायिक नंतर प्रतिक्रमण ही क्रिया करतो.
सामायिक मध्ये ज्ञान झालेले अतिचार समोर आल्यानंतर त्या अतिचाराची क्षमा याचना प्रतिक्रमण मध्ये केली जाते.
अशाप्रमाणे रोज नित्यनियमाने केलेले सामाईक, प्रतिक्रमण साधकाला पुण्यमार्गावर घेवून जाते व तो साधक चारित्र्य संपन्न होतो.
येथे श्रावकाची चारित्र्य संपन्नता स्पष्ट होते. या प्रकियेतून साधक हा तावून सुलाखून चारित्र्य संपन्न होतो.
त्याला जळी स्थळी काष्टी, पाषाणी ज्ञान दर्शन चारित्र्य याची अनुभूती येत रहाने. त्याचे जीवन कटीबद्ध होते.
तो आपल्या चाकोरीतून बाहेर पडत नाही व तेथे त्याला पुंण्याचे साठे दिसू लागतात. पुढचा प्रवास खडतर आहे. अचून बराच बाकी आहे. हे त्याचे लक्षात येते. पण त्या प्रवासाची तयारी तो या ज्ञान दर्शन चारित्र्य यांचे माध्यमातून रोज करीत असतो.
या सर्वांच्या मुळाशी आहेत ते आतिचार बंधने, ती आपण गोड मानून घेतली पाहिजेत. प्रामाणिकपणे ती शोधली पाहिजेत व त्यात कांही चूक झाली असेल त्याची क्षमा याचना केली पाहिजे.
येथे परमेश्वर सर्वत्र आहे. तो कुठे नाही असे दाखवा असे म्हटले जाते. तेव्हा या सृष्टीत असणार्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तुमध्ये त्याचा वास आहे. तेव्हा त्या वस्तुवर आपण आपल्या सुखोपभोगासाठी जर कांही अत्याचार केले तर त्याची क्षमा याचना करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे व ते आपण नियमित पणे करणे गरजेचे आहे.