आपत्ती

आपत्ती म्हणजे संकट म्हणजे ठोकर.अनपेक्षित पणे नको असणारी गोष्ट समोर उभी रहाणे.

प्रपंचात अचानकपणे अशा आपत्ती समोर येऊन उभ्या राहतात की कांहीजण या आपत्तीला घाबरून नाराज होतात, हतबल होतात, जगण्याची आशा गमावून बसतात.

मात्र कांहीजण हुषार असतात ते या संकटला संधी समजून त्या संधीला खंबीरपणाने तोंड देतात व संधीचे सोने करतात. ते जीवनांत यशस्वी होतात.

आपत्ती जशा प्रपंचात येतात मानव निर्मित असतात. तशा निसर्गात पण निसर्ग निर्मित आपत्ती दिसतात. त्यांना तोंड देण्यासाठी मानवाला बुद्धी दिलेली असते. त्या बुद्धीचा वापर करुन मनांत आपत्ती निवारणाचे चिंतन करुन विवेकी माणसाने त्यातून मार्ग काढावयाचा असतो.

जो कुशलतेने हा मार्ग शोधतो तो जीवनांत यशस्वी होतो.
प्रपंचात चोरी होणे, जवळचा आधार असणारा सोबती जाणे, तसेच निसर्गात अचानक जोराचा वादळी पाऊस येणे, पूर येवून सर्व उध्वस्त होणे, दुष्काळ येणे ही आपत्तीची उदाहरणे आहेत.

पण ज्याने आपणाबरोबर इतरांचे दु:खाचा विचार केला त्यांना मदत केली तो खरा पारमार्थिक साधक समजला जातो.

या संदर्भात एक आठवण मला आली ती अशी एक दिवस सायं पाचची वेळ होती. एका महत्वाचे कार्यक्रमासाठी मला बाहेर पडावयाचे असते. मी सर्व तयार होवून बाहेर पडणार तोच बरेच दिवस येतो येतो म्हणणारा माझा मित्र सहकुटुंब मला भेटायला दारात उभा राहिला. त्याने न कळविता अचानक येणे केले ही अवस्था पाहून मनांत आले, ही काय आपत्ती!

समोरच्याला पण क्षणाचा विचार करुन विवेक जागृत करुन मी त्याचे स्वागत केले व त्याला घरातील सर्वांबरोबर थोडा वेळ काढण्याची विनंती केली. मी कार्यक्रम आटोपून घईगडबडीत परत घरी आलो व मित्राला भेटलो. विचारपूस केली दोघांची मनोगते झाली. खूप गप्पा झाल्या.

मित्र अचानक येण्याचे कारण सांगू लागला. तो म्हणाला मित्रा माझा मुलगा आजच पदवीधर झाला आहे व ही आनंदाची बातमी तुला सांगण्यासाठी आम्ही सर्वजण तुझ्याकडे आलो आहोत. आता त्याच्यासाठी नोकरी शोधावयाची आहे. तेव्हा तूच मदत करु शकशील.

हे ऐकून मला आनंद झाला मी त्याचेशी हस्तांदोलन केले. मी त्याला म्हणालो अगदी वेळेत आपली भेट झाली मी आज ज्या कार्यक्रमाला गेलो होतो तो एक नांमाकित कंपनीच्या शोरुमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. तेथे त्या कंपनीच्या विस्तारासाठी एक चांगला व्यक्ति नेमण्याची जबाबदारी माझेवर टाकण्यात आली व घरी येताच ती जबाबदारी तुझ्या पदवीधर झालेल्या मुला मुळे मी पूर्ण केली.

केवढे हे भाग्य घरातून बाहेर पडताना जी मला आपत्ती वाटली ती घरात येताच सुसंधी झाली.

मित्राचे भाग्य उजळले त्या कंपनीत माझा मान सन्मान संपत्ती वाढली.

तेव्हा आपत्ती आली म्हणून नाराज होवू नका. तिला तोंड देण्यासाठी विवेक जागृत करा व आपत्तीतून संपत्ती सन्मान कसा निर्माण होईल हे पहा.

याप्रमाणे आपत्ती संकट येताच ती सुसंधी समजून धाडसाने त्यावर मात करा. याप्रमाणे एक एक अपत्तीशी सामना करीत करीत भवसागर पार करा.

जीवनांत यशस्वी व्हा. आनंदी व्हा.

Leave a comment