होळी -रंगोत्सव

आज होळी पौर्णिमा. आज वर्षभरात कळत न कळत झालेल्या चांगल्या वाईट कर्माचे हवन करावयाचे आहे. हा रंगोत्सव नविन वर्षात नवीन संकल्प करण्याची, स्वप्नांना रंगांनी भरुन टाकायची आहेत.

तेव्हा कवि म्हणतो –

भिजु दे रंग अन अंग स्वच्छंद
अखंड उठू दे मनी रंग तरंग|
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग||

मी जमा करतोय आज, तिरस्काराची लाकडं,
मत्सराच्या गोवर्‍या, हिरव्या दण्याचे गवत,
होळीत दहन करायचं आहे,
ज्वाळ गगनास भिडवायचा आहे,
तुम्ही करता का थोडी मदत?

आज जमवायचे आहेत सारे रंग एकत्र
काळा ,पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा, इत्यादी|
झाकायची आहे त्याच रंगात
जात, धर्म, कर्म, अन बरचसं काही||

फक्त माणूस कळला पाहिजे,
इतकीच सरळ अन साधी.. मागणी आहे.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र, आळस यांचे दहन होवो व सर्वांचे आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो हीच होळी पौर्णिमेची शुभेच्छा !

तुकोबांची होळी

मी होळीत काय आणि कां जाळलं ?

तुकोबा म्हणतात, लोक होळीत शेणाच्या गवऱ्या – लाकडं जाळतात. मी होळीत माझ्यातले दोष जाळले आणि दोष जाळण्याचा परीणाम असा झाला, की दारिद्रय आणि दु:ख माझ्या जवळसुद्धा येत नाही.

दोष नाही, तर दारिद्रय नाही. त्यामुळे दारिद्रयातून येणारे दु:ख नाही . दु:ख तर जवळ येतच नाही, उलट सुख माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात.

पण मी त्यांना माझ्या डोळ्या समोरही उभं करत नाही. सगळं जग सुखाच्या मागं लागलं असताना, तुकोबाराया सुखाला हकलून लावतात कारण, त्यांना सुखाची हाव नाही आणि दोष जाळल्यामुळे दु:ख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे.

ते पुढे म्हणतात मला सुखाची अपेक्षा कां नाही? तर, संतांचा सहवास आणि विठोबाचं नांव, एवढ्याचीच मला आवड आहे. मला मागायचे असेल, तर मी सुख नाही मागणार, फक्त संतांचा सहवास आणि विठोबाचं नांव एवढच मी मागेन.

याच्यापुढे तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढे मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहिल ?

मी माझ्या पोटात विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळे, मला आता कशाची कमतरता ?

सगळं भरुन पावण्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको.

अर्थात मोक्षा नंतर मिळणारं वैकुंठही नको.

Leave a comment