कर्म आणि धर्म

कर्म म्हणजे आपल्या हातून सतत होत असणारे काम.

ते कर्म चांगले असते, वाईट असते, त्या कर्मामुळे एखादा सुखावला जातो, तर एखाद्या कर्मामुळे दुसरा दुखावला जातो. हे चक्र आहोरात्र चालू असते. ते कधीच थांबत नाही. प्रत्येक कर्माची फळे माणूस भोगत असतो.

चांगल्या कर्मामुळे त्याला समाधान, शांती मिळते, तर वाईट कर्मे त्याला दु:खाचे खाईत ढकलतात.

तेव्हा हा झाला कर्म सिद्धांत.

धर्म हे पण एक प्रकारचे कर्मच आहे. सत्याने वागा, कुणाची फसवणूक करु नका, गरजुला मदत करा, कोणत्याही लालसेला भाळून आसक्त होवून कुणाला चिटकून राहू नका. अशी जी शिकवण मिळते त्या शिकवणीला धर्म म्हणतात.

थोडक्यात कर्माचा बाजार भरलेला आहे. या बाजारात माणूस चक्रावून गेला आहे. काय घ्यावे काय नाही हे त्याला कळेनासे झाले आहे. अशा बाजारात कांही उत्तम विक्रेते दलाल बसले आहेत. त्यांनी दुकानारला पाट्या लावलेल्या आहेत, सत्यंम् शिवं सुंदरम् ! आज रोख उद्या उधार.

या विकृतीच्या बाजारात मला संस्कृतिची ही दुकाने दिसली. मी प्रकृति स्वास्थ्यासाठी या प्रकृतिच्या दुकानात प्रवेश केला.

शेठजी दुकानांत निवांत बसले होते. दुकानांत सर्व गोष्टी शिस्तबद्ध चालल्या होत्या तेथे किंमती बद्दल चढाओढ नव्हती. सर्व माल व्यवस्थित सिल करुन ठेवला होता. सर्व कामगार प्रेमाने आपले काम करीत होते.

एवढा मोठा धंदा चालू असताना मालक मात्र लांब बसून शांतपणाने हे सर्व पहात होता. त्याला कशाची काळजी वाटत नव्हती व बाहेर काय चालले आहे, याची पण जाणीव नव्हती.

कारण बैठकीवर बसून तो धर्माचे आचरण करत होता व त्याप्रमाणे धर्माचे पालन करण्याचे धडे कामगारांना देत होता. गिर्‍हाईक पण आनंदाने या पेढीतून आपली खरेदी करीत होता.

तेथे माझ्या लक्षात आले की, कर्म करीत असताना सुद्धा धर्म पाळता येतो. पण धर्म पाळण्यासाठी माणसाची मनाची बैठक धर्मावर अधिष्ठीत असावी लागते, त्यासाठी चिंतन, मनन करणे गरजेचे असते. चिंतनातून या भव्य बाजारातून आपणाला नक्की काय घ्यायचे ते ठरवावे लागते.

विवेकी माणूस बाजारात भटकत रहाण्यापेक्षा, प्रकृति, संस्कृति या पाट्यांच्या दुकानात जातो तेथे आपली खरेदी पूर्ण करतो व आनंदाने घर वापसी करतो.

कांहीजण मात्र कोपर्‍यात असलेल्या विकृतीच्या दुकानात जातात. तेथे; चोरी लांडी लबाडीने आणलेल्या वस्तुचा बाजार चालू असतो.

त्या गर्दीत चोरी, पाकीटमारी पण होते, तेथे मात्र धर्माला आजीबात थारा नसतो. त्या दुकानातून घेतलेल्या वस्तू त्याला अशांती, दु:ख देतात, हे पण कर्माचेच फळ आहे.

याचाच अर्थ कर्म करीत असताना धर्माचा विचार मनांत ठेवा. धर्माने कर्म करीत जा. कर्माचे पालन हेच धर्माचे पालन होय.

जेष्ठांनी हा सिद्धांत डोक्यात ठेवणे गरजेचे आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात आपण धर्माचा विचार कर्म करताना कधी केला नाही. आता निवांत वेळ आहे, केलेले कर्म धर्मानुसार आहे का? याचा विचार करा.

धर्माविरुद्ध केलेली कर्मे ईश्‍वरालाच अर्पण करा, क्षमा वृत्ती वाढवा. क्षमा श्रेष्ठत्व लक्षणम् ॥

तम्ही श्रेष्ठ जेष्ठ आहात. कर्म करीत असताना, होणारे अपराध तुम्ही मोठ्या मनाने माफ करा , त्या कर्माला क्षमा मगा . यामुळे प्रकृति व संस्कृतीची दुकाने जोमाने चालतील.

ज्या दुकानात कर्म व धर्म एकमेकांचे हातात हात घालून कर्म करीत आहेत. ती दुकाने विश्‍वात्मक धर्माचा प्रचारक आहेत असे मला वाटते.

Leave a comment