मनांतल्या घरात

प्रपंचात अन्न-वस्त्र-निवारा या गोष्टी गरजेच्या आहेत.

माणूस जन्माला आल्यापासून घराच्या शोधात असतो. जसा जसा वाढतो तसं तसं घर बदलत असतो. माणसचं नाही, तर पशु-पक्षी पण घर करुन रहात असतात. कुणाची घरं शेतात असतात, तर कुणाची झाडावर.

प्रत्येकाचे घर वेगळे असते. कुणी एका खोलीचं घर घेतो, कुणी दोन, कुणी तीन खोल्याचं घर घेतो. कुणी स्वतंत्र बंगला बांधतो.

त्या घराला सजविणारा कलाकार असतो. तो त्याच्या कुशलतेने घराला रंग रुप देतो.

सृष्टीमध्ये अनेक प्रकारची घरे पहावयास मिळतात. कोणी मंगळावर घर करण्याचे स्वप्न पहातो.

अशा स्वप्नात मला वाटेल आपण आपले घर मनांत बांधुया.

त्याप्रमाणे मी माझी घर बांधण्याची मोहिम मनाकडे वळविली. मी मनाच्या घरचा पाहुणचार घेण्यास निघालो. उत्सुकता होती तेथे कोण कोण आहेत. त्यांनी कसे ठेवले आहे घर, ते कसे करतात स्वागत अशा विचाराने मी माझी मजल मनाच्या घराकडे वळविली. विचार करीत करीत, चौकशी करीत करीत मी मनाचे घराचे दारात पोहचलो. आत जाण्यासाठी दार होते पण ते अतिशय छोटे व छान होते.

रखवारलदार मला ओळख पटल्याशिवाय आत सोडीनासे झाले तेव्हा मी त्यांना माझे ओळखपत्र दाखवून आत प्रवेश घेतला. माझी ओळख नम्रतेने करुन दिली त्यामुळे मला आंत प्रवेश मिळाला.

आत पहातो तर सर्वत्र अंध:कार. तेव्हा लक्षात आले. आपण येताना आणलेली भेट उघडून ठेवू. त्याप्रमाणे मी सकारात्मक विचारांची दिपरचना तेथे केली व त्या मनाच्या घरात ज्ञानदीप उजळला.

त्या उजेडात मी मनाच्या घरांत आणखी पुढं गेलो.

तेथे असंख्य खोल्या होत्या. तेथे सर्वच कोंदट हवामान होते.

मी ऐका खोलीचे दार उघडले. तेथे राग लोभाने माखलेले अनेक चेहरे समोर आले. मला भय उत्पन्न झाले. वाटले आता आपली धडगत नाही. तेथे माझ्या लक्षात आले की आपण जे राग, लोभ, आसक्ती, ईशा या रुपाने जमवलेले हे चेहरे किती भयानक आहेत.

मी धाडस करुन घुढचे दार उघडले. तेथे माझ्या आयुष्यातील दु:खद आठवणी स्वत:ला कोंडून घेऊन बसल्या होत्या. जगाला तोंड दाखविण्याचे धाडस त्यांना होत नव्हते.

पुढचा प्रवास अवघड होतो. अजुन पुष्कळ खोल्यांची दार उघडायची होती. मनावर भितीचे सावट बसलं होतं.

मन धीट करुन मी पुढचा प्रवास सुरु केला. येथे ऐकेका खोल्यांनी आपले आरक्षण दारावर लिहून ठेवले होते.

त्यात एक द्वेषाचे, एक इर्षेचे, एक वाईट विचरांचे, कोठे मतभेदाचे आरक्षण होते. आरक्षणाने माझा जीव मेटाकुटीस आला.

सर्वांनी आपल्या मागण्यापुढे मांडल्या घोषणाबाजीमुळे मन सुन्न झालं. डोकं गरगरायला लागलं. त्यामुळे पुढे जगण्याची इच्छाच संपली.

अशा या अंधार्‍या कोठडीतील खोल्यातून जात असताना. मला एक आशेचा किरण दिसला. तो होता तळपत्या सूर्याचा, अखंड यज्ञाचा. त्यात समीधा पडत होत्या व प्रत्येक समीधे बरोबर मनांतल्या घरात साठलेली काष्टके (राग, द्वेष, मत्सर), टाकली जात होती.

तेथुन पुढे गेलो तर मी आश्‍चर्य चकित झालो.

मला स्वर्गसुखाचं वातावरण दिसलं. तिथ प्रेम, माया, आनंद होता. उत्साह होता. चैतन्य होतं. तेथे समाधान शांती सुख भरलेलं होतं.

तेथे मला पटलं माझ्या मनांतील घर काय आहे. ज्या घरात शांती, सुख, समाधान आहे. ज्या घरातील अशांती द्वेष मत्सर सर्व साफ निघुन गेले आहेत. असे सुंदर घर माझ्या मनांत तयार झाले आहे. तेव्हा या घरासाठी मला वास्तुतज्ञाची मदत घेणे गरजेचे नाही.

मीच आहे माझ्या घराचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे माझे घराला माझ्या मनातील घराला घरपण देणारा मीच आहे. मात्र मला त्यासाठी चिंतन मनन करणे गरजेचे आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अशा घरामध्ये संतांची गुरुंची वस्ती होते व तेच घर देवाचे घर, मंदीर होते.

या मंदीराभोवती अतिक्रमण करुन राहुट्या ठोकून ज्यांनी आपापली घरे बसविली होती, त्यांची गर्दी मंदीराभोवती होती. माझ्या चिंतनाने मी या सर्व अतिक्रमणांचे परीमार्जन केले व सुंदर, रमणीय असे मनातील मन मंदीर उभारले.

नको त्या, कुंपणाचे रक्षण कर्त्याची हकालपट्टी मी केली. तेथे मनांत विचार आला आतापर्यंत नकारात्मक गोष्टींची साठवण करीत, सुख समाधानाचा रस्ता आपणच अडवला आहे. तो रस्ता साफ करण्यासाठी वेळ जाईल पण पर्यावरण राखत सुका – ओला, मायाजालाचा कचरा अलग अलग करीत आपण मनाचं घर साफ करु.

यातून काय बोध घ्यावयाचा तर आपल्या मनाचं घर, दुसर्‍याच्या हातात द्यावयाचं नाही. स्वत:च्या घराची साफसफाई स्वत:च करावयाची. स्वावलंबी जीवन जगायचं. भाडेतत्वावर कुणाला घराची वहीवाट करु द्यायची नाही. आपण प्रत्येकजण आता आपल्या मनाच्या घराला भेट देण्यास उत्सुक झाला आहात.

तर आवश्य प्रयत्न करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.

1 Comment

  • सुरेखा तीवाटने
    Posted September 13, 2022 8:25 pm 0Likes

    कधी कधी आपल्यालाच आपल्यातील मी, ची भेट होत असते!!!
    भेट झाली तरी पण मी म्हणजे नेमके कोण???
    तेव्हा आपण शोधत बसतो
    माझ्यातल्या मी ला, काय हवय मी ला नेमक काय हवयं? मी ला काय वाटतय?
    मी ला काय सुचतंय?
    मी ला काय म्हणायचंय?
    मी च अस्तित्व नेमक काय?
    बहुतेकदा या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न बंद करतो
    कराव लागत!!!
    घरीदारी जबाबदार्‍या,
    ,कर्तव्याच्या ओझ्याखाली ओझ्याखाली मी ला दडपून टाकतो प्रश्न पुसून टाकतो
    उत्तरे मिळू नये याची खबरदारी घेतो
    याला आपण परिस्थिती नुसार समंजसपणा तडजोड त्याग, समर्पण
    नांव देतो,,

Leave a comment