विसकटलेली पाने

जीवनात, सृष्टीत, परमार्थात पानांना फार महत्व आहे.

सृष्टीत ती झाडांची पाने असतात.

परमार्थात श्रद्धेची पाने असतात तशी जीवनात खाऊची पाने असतात.

ही सर्व पाने जोपर्यंत भक्कम असतात, तो पर्यंत सर्व कांही सुरळीत असते.

उदा. दिवस पावसाळ्याचे होते, सोसाट्याचा वारा वहात होता. मधूनच एखादी पावसाची सर पडत होती. घरात अंगणांत पाणीच पाणी झाले होते.

पाऊस, ऊन, वारा यापासून संरक्षण मिळावे म्हणून घराला घातलेली पत्र्याची पाने बर्‍याच पावसाळ्यानंतर गंजत चालली होती. त्यांना पावसाच्या आघातामुळे छिद्रे पडली होती. कुठे कुठे त्यांची सांधमोड फाटत चालली होती. पत्र्याची पाने हळू हळू विलग होत होती. ही प्रपंचाच्या पानाची अवस्था होती.

ही विसकटलेल्या प्रपंचाच्या पत्र्याची दशा होती.

तेव्हा लक्षात आले की निवारा देणारी पाने जेव्हा एकमेकांत चांगली बांधली होती, तसे कुटूंब, परिवार आनंदी शाबूत होता.

त्यातील एक एक पान जसं विखरलं जाऊ लागलं, तसं परिवाराचं स्वास्थ ढासळू लागलं.

असेच एकदा मी बाजारात गेलो. द्राक्षाचा हंगाम होता. मी त्या शेतकर्‍याला विचारले, द्राक्षाचा भाव काय? त्याने मला सांगितले 60 रुपये किले व शेजारी पडलेली सुटी सुटी द्राक्षे 20 रुपये किलो.

तेथे माझ्या लक्षांत आले की निखळलेली छपराची पाने, घडातून विस्कटलेली द्राक्षे व प्रपंचात एकमेकांपासून अलग झालेली माणसे यांना किंमत नाही.

एकीचे बळ श्रेेष्ठ होय.

माणसाने हेच चिंतन मनांत ठेवावे. मी कोणत्यातरी वेळीचे पान आहे.

जो पर्यंत इतर पानाबरोबर आहे तो पर्यंत माझी सावली प्रवाशाला मिळेल.

पण पतझड सुरु झाली, की सर्व संपले. तेथे रुक्षता येते.

हे खास तेव्हा प्रपंचात पतझड झालेल्या वृक्षांना वेळीच खत, पाणी घालावे वेळीच घराची विस्कटलेली पत्र्याची पाने जोडावीत.

तरच द्राक्षाला घडाप्रमाणे भाव मिळेल.

प्रपंचात विचारांची एकता असणे गरजेचे आहे.
जोपर्यंत प्रपंचात विवेक असतो, तोपर्यंत प्रपंचात आपण एकमेकांसाठी जीवाचे रान करतो, एकमेकांना मदत करतो.

जर क्रोधाने मोहाने, मायेने वादळ उठविले तर प्रपंचाची धूळधाण उडून जाईल.

चारही दिशेला पळून गेलेली प्रपंचाची पाने पुन्हा एकत्र आणणे फार कठीण होवून चाईल.

तेव्हा वेळीच ही पाने एकत्र कशी रहातील याचा विचार करा.

प्रपंचात ज्याने ही पाने बरोबर संघटीत ठेवली त्याने उत्तम प्रपंच केला असे म्हटले जाते.

तोच साधक परमार्थात जाताना भगवंतासाठी आणलेली फुलेपाने संघटीत करुन त्यांचा सुंदर हार बनवून परमेश्‍वराला अर्पण करेल.

त्यालाच परमेश्‍वराचे आनंदी स्वरुप दिसेल. तेव्हा फुले पाने, नाती-गोती विस्कटण्या अगोदर बांधण्याचा प्रयत्न करा.

मानवी जीवन सुरक्षीत ठेवा…!

Leave a comment