शिक्षा याचा अर्थ केलेल्या दुष्कर्माचे फळ.
मनुष्य शांत बसू शकत नाही. सतत कांही ना काही कर्म करीत रहातो. त्या कर्मातून त्याला बरे वाईट फळ प्राप्ती होतच रहाते. यालाच आपण सुख-दुख म्हणतो.
आतापर्यंत मला वाटायचे चोरी, खुन, खराबी केली की शिक्षा होते, पण जेव्हा मी खोलात विचार करु लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की शिक्षा ही प्रत्येक दुष्कर्माची मिळते. त्या शिक्षेतून कुणाची सुटका नसते.
एखाद्या गुन्ह्याला जामिन देवून तात्पुरती ती शिक्षा लांबवली जाते. पण कालांतरानी त्याला ती भोगावीच लागते.
बालपणात आपण रोज खोड्या काढतो, रोज लोक तक्रारी घेऊन घरी येतात. कंटाळून आई-वडील त्या बालकाला सुधारण्यासाठी शिक्षा देतात व पुन्हा अशी चूक करणार नाही असे वदवून घेतात.
एखाद्या अन्याया विरुद्ध जमाव करुन निदर्शने दाखविली तरी तो गुन्हा होतो व त्यासाठी शिक्षा भोगावी लागते.
तर काही ठिकाणी आई-वडिलांचे वचनपूर्तीसाठी मुलांना शिक्षा भोगावी लागते. अशी उदाहरणे आपण रामायण-महाभारतात पहात आलो आहे.
या सर्व उदाहरणातून एकच गोष्ट लक्षात येते, तुम्ही नम्र व्हा. तुमची चूक स्वत: शोधा. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.
ते झाले नाहीतर साधुसंतांचे सानिध्य गाठा, त्यांना सर्व कथन करा व ते सांगतील ती शिक्षा शिरसावंद्य करा.
कर्म केल्या शिवाय आपण राहू शकत नाही. तेव्हा कर्माचा लेखाजोखा परमेश्वराकडे सोपवा व झालेल्या दुष्कर्माची जी शिक्षा तो मिळेल ती नम्रतेने मान्य करा.
काही शिक्षा शाप म्हणून दिल्या जातात, तर काही शिक्षेतून एखाद्याचा भाग्योदय होतो. तेव्हा विवेक जागृत ठेवून शिक्षेचा स्विकार करा.
माया, मोह, क्रोधाच्या आहारी जाऊन दंगल धोपा करण्यापेक्षा विवेकाने आत्मपरिक्षण करुन शिक्षा भोगा. तुमचे उर्वरीत आयुष्य शांततेत, सुखात, समाधानांत जाईल.
जो दुसर्याच्या हिशोबाचा लेखा जोखा ठेवतो त्याला चार्टर्ड अकौंटंट म्हणतात. तसेच जो स्वत:च्या मन, वचन, काया द्वारे झालेल्या अपराधाचा लेखा जोखा ठेवतो तो पुरुषोत्तम म्हटला जातो.
मानवभव, उदात्ततेचा धागा तुटला,
हीनतेकडे मानव झुकला,
चौर्यांऐंशी लाख फेरा फिरुनी,
मानवभव हा असे लाभला.
चिंतामणी सम अनमोल हीरा हा,
कवडीमोले उधळीत गेला,
नफरत ईर्षा, लोभ, असूया,
आत्मघातकी संगत यांची,
यातच मानव पूर्ण अडकला.
आत्मसुखाला वंचित झाला.
यासाठी शिक्षा काय द्यावी?
देव असावा सदा अंतरी,
नित्य करावी त्याची भक्ती,
जोवरी नाही संतोष मनाला,
तोवरी नाही शांती जिवाला ॥
त्यामुळे आपण शिक्षेला घाबरु नये, आनंदाने शिक्षा मान्य करावी व उपभोगावी, हेच शिक्षेचे खरे स्वरुप आहे.
स्वातंत्र्य वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली, एकांतवासात अनेक वर्षे जीवन कंठावे लागले. पण या शिक्षेतून देशाला स्वातंत्र्याचे धडे मिळाले.