मोजमाप

मोजमापाची सुरुवात बालकापासून सुरु होते. बालकाला पाढे शिकविले जातात. ते कशासाठी तर पुढे त्याला उत्तम मोजमाप करता यावे म्हणून.

डॉक्टर त्याची तपासणी करुन तो सुदृढ आहे अगर कुपोषित आहे याचे मोजमाप करुन त्या बालकावर उपचार करतो.

शाळेत परीक्षा घेत घेत विद्यार्थ्यांचे मोजमाप केले जाते व त्याला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातो.

वयात आल्यावर त्याची योग्यता पाहून त्याचे लग्न केले जाते. तेथेपण शिक्षण, व्यवसाय, संपत्ती याचे मोजमाप होतेच. येवढेच नाही, तर लग्नाला किती व कोणती माणसे बोलवायची यांचेपण मोजमाप केले जाते. लग्नात कुणाला किती आहेर करावयाचा व त्यांनी आपणाला किती केला होता, याचेपण मोजमाप केले जाते.

अशा या मोजमापाचे गुर्‍हाळ आयुष्यभर चालू असते. सर्वजण प्रपंचात पैशाचे, सुखाचे जमीनजुमल्याचे मोजमाप करीत असतात. त्यातून नफातोटा काढतात व आढावा मांडतात.

येवढे पैसे कमवून मिळवलेले धन इहलोकी शांती समाधान देत नाही व परलोकी ते उपयोगी पडत नाही.

त्यामुळे या धनाचे मोजमाप फलश्रृती देऊ शकत नाही.

प्रपंचात असे काटेकोर बनुन चालत नाही. तेथे उदार अंत:करणाने, आनंद समाधान, मैत्री वाटत जावे लागते. तेथे जर काटकसर करत गेलो तर आयुष्याची गोडी संपून जाईल.

तेव्हा तेथे मोजमाप काटेकोरपणे न करता सढळ हाताने करावे. जेवढे जास्त द्याल तेवढे भरभरुन परत येईल.

परमेश्‍वर पण हातात तराजू घेऊन बसला आहे. त्याला भक्तिची भूक आहे.

जो साधक भावभक्तीने परमेश्‍वराला आळवतो, त्याचे पारड्यात सुख समाधान शांती भरभरुन टाकतो.

देणार्‍याने देतच रहावे. मोजमाप करु नये, भक्तीभाव मनांत ठेवून परमेश्‍वराला अर्पण व्हावे.

Leave a comment