आज २८ जानेवारी…
आज ज्येष्ठ गायिका #सुमन_कल्याणपूर यांचा वाढदिवस… 💐
जन्म.२८ जानेवारी १९३८
सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या.
सुमन हेमाडी हे नाव लग्नाआधीचे. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. मराठी भाव तसेच सिने-संगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे योगदान फार मोठे आहे.
एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या “मंगु” या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते “कोई पुकारे धीरे से तुझे”. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. सुमन कल्याणपुर यांच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते.
“जिथे सागरा धरणी मिळते” असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, “घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात” असे म्हणणारी सासुरवाशीण, “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि” हि अंगाई, “कशी गवळण राधा बावरली” हि गवळण, “सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी” हे विरहगीत, “नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे”, “केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर” ही ‘भावगीते’, “केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा”, “जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे”, “देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा” सारखी ‘भक्तीगीते’, “उठा उठा चिऊताई”, “या लाडक्या मुलांनो या” सारखी ‘बालगीते’, अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो. सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी श्री दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच आज मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली आहेत. यशवंत देव त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे सुमन कल्याणपूर. त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली. सुमन कल्याणपुर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे.
“न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया”, “ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा”, “तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी”, “परबतो के पेडो पर शाम का बसेरा है”, “अज हु ना आये बालमा”, “तुमने पुकारा और हम चले आये” “मेरे मेहबुब न जा”, “नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे”, “आपसे हमको बिछडे हुए”, “चले जा चले जा….जहां प्यार मिले”, “मन गाए वो तराना”, “दिल ने फिर याद किया” या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावर असतानाच त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले.
काही अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या “चांद” ह्या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या.
सुमन कल्याणपूर यांनी तब्बल ७४० चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार सुमनताई कल्याणपूर यांना नुकताच जाहीर झाला आहे.
सुमन कल्याणपूर यांना वाढदिवसाच्या आणि सुरारोग्यमय दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !🌹
…..✌️
संदर्भ :- इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=z2k6bGcXByU
https://www.youtube.com/watch?v=TUELGFIJtlw
https://www.youtube.com/watch?v=6sB-DJfsyuA
सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही मराठी गाणी.
https://www.youtube.com/watch?v=K77t706fcnE