पाठराखीण

पाठराखीण…….

जगबुडी नदीच्या काठावर आईचं गाव….मोजून २३ घरं….फार वस्ती नाहीच…

आई वय ८३, एकटीच राहते आणि तिच्यापुरता स्वयंपाक करते, एखादी भाजी तीही नावाला, आमटी भात, कुळीथ पिठलं भात, अगदी कंटाळा आला तर ताकभात…..लेक येणार असेल तर पोळी आणि साग्रसंगीत भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, कोबी खोबरं घालून…..आईचं घर आतल्या रस्त्याला, त्याच गावात मुलीचं घर….जेमतेम २०० मीटर अंतर….

घर जवळ असलं तरी लेकीचं सारखं सारखं जाणं होत नसे….तिचं कुटुंब तसं मोठं, त्यामुळे तिची कामं दिवसभर सुरू असायची….कामं करणं आणि करून घेणं, अव्याहत सुरू….सुपारी, नारळ, आंबा, काजू यांची व्यवस्था बघणं….

तिच्याकडे गुरं होती…..एक बैलजोडी शेतावर असायची आणि घरच्या गोठ्यात, एक म्हैस, तीही आईने लग्नात सोबत पाठवलेली पाठराखीण….सकाळी आणि संध्याकाळी त्यांचे कासरे सोडले की सरळ नाकासमोर नदीवर जायची….वाटेत कोणी पोळी दिली तरच तोंड लावणार….उगीच उकिरडे हुंगायची नाही….
अगदी ठरलेल्या वेळी जाणार, आपणहून येणार, रोजचा रिवाज….

जरी लेकीचं आईकडे जाणं दुर्मीळ असलं तरी तिची सगुणा मात्र न चुकता, आईच्या दारात उभी राहून हक्काने भाताचा घास मागायची…..माहेरच ना तीचं…… घास खाऊन झाल्यावर घरी…..लेकीला तिच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज यायचा आणि म्हणायची….आलीस का ग? बरी आहे ना ग आई?…..पुन्हा एकदा मान डोलवून घंटेचा आवाज यायचा…..बर केलंस हो, तू चौकशी केलीस ते….असे ठरलेले डायलॉग असायचे,
रिवाज सुरू होता…..

गावात देवीचा उत्सव होता, लेकीला पहाटे लवकर उठून नैवेद्यासाठी सोवळ्याचा स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी आदल्यादिवशी पासून तयारी सुरू होती….भाज्या निवडायच्या होत्या, कुयरी चिरायची होती….त्याची आमसूल, गुळातली भाजी… सतराशे साठ गोष्टी….
दुपारी नैवेद्य दाखवून, प्रसादाचे वाटप झालं….धावपळीत लेकीच्या पायाचे तुकडे पडले होते…

सगुणा नेहमीप्रमाणे संध्याकाळी नदीवर गेली….आज तिला आल्यावर कुयरीची पाठ मिळणार होती….
ठरल्या वेळेनुसार घरी येणं अपेक्षित होतं…. पण आज उशीर झाला होता, लेकीला फार स्वयंपाक नव्हताच, पण ठरलेली वेळ निघून गेल्यावर काळजी वाटायला लागली, सगुणाचा पत्ता नव्हता, काय झालं असेल? नदीवर काही झालं नसेल ना? चिखलात काही चावले की काय…..
की आईने अजून खायला दिलं म्हणून ठोकला मुक्काम…..
अजून दहा मिनिटं गेली तरी येईना, तुळशीला दिवा लावून झाला….शेवटी दुखऱ्या पायाने ही निघाली….टॉर्च घेऊन,
नदीकडे जाताना वाटेत आईचं घर लागतं….. अंधारात टॉर्च मारल्यावर डोळे चमकले…..जवळ गेल्यावर समोर सगुणा, आईच्या घराच्या दारात उभी होती……दार उघडं दिसलं…
हिने सगुणाच्या पाठीवर हात फिरवला, ती शहारली….
काय ग गधडे, मी तुझी वाट बघत्ये आणि तू इकडे मुक्काम…..तुला आईने भाताचा घास दिला नाही का?….

घास खाल्ल्याशिवाय दारातून निघायचं नाही हा रिवाज…

लेकीने बाहेरून हाक मारली…आई…..अग सगुणा वाट बघत्ये तुझी…..आई काहीच बोलेना, दारात चप्पल काढून आत गेली….सगळे दिवे चालू….स्वयंपाकघर रिकामं, चूल थंड, माजघरात नाही, शेवटी परसात गेली…..

बघून पायाखालची जमीन सरकली…..आई जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती, हिने पटकन तांब्यातून पाणी शिंपडलं….. आई भानावर आली….अग काय झालं तुला….काही नाही ग, परसात जाऊन आले आणि चक्कर आली….कळायच्या आत जमिनीवर…
देवा, असं कसं ग करून चालेल? तू खाल्लं नव्हतं का काही, धाप लागत्ये का? काय होतंय?
मला मेलीला काय होणार ८३ व्या वर्षी….साधी चक्कर आली ग, बराच वेळ पाणी नव्हतं प्यायलं….. आज निर्जळा एकादशी आहे ना…..माझी अर्धी लाकडं गेली….लेकीने तिच्या तोंडावर हात ठेवून पुढचे शब्द बोलू दिले नाहीत, तिन्ही सांजेला वाईट बोलू नये हे तूच शिकवलं ना मला….तिला खुर्चीवर बसवलं, गुळाचा खडा आणि पाणी दिलं….आईला बरं वाटलं…
आई म्हणाली, हे सगळं ठिके पण तू का आलीस?…..

लेकीने कपाळावर हात ठेवला….सगुणा घरी आली नाही, तुझ्या दारात घास घ्यायची वाट बघत उभी होती, तू आली नाहीस, ती इथेच ठिय्या देऊन उभी….
ती घरी आली नाही, म्हणून मी बघायला आले….तर उभी तुझी दुसरी लेक….

आईच्या डोळ्यात पाणी आलं…हातात घास घेऊन, दोघी बाहेर आल्या….घास भरवला, सगुणाला चक्क मिठी मारली…तू थांबलीस म्हणून माझी लेक आली आणि मी वाचले हो….

सगुणाने गळयातल्या घंटेचा आवाज केला….
©पराग दामले

Leave a comment